Tuesday, 4 October 2022

सह्याद्री तील पुष्पोत्सव

कारवी बहर: सह्याद्रीला लाभलेले एक अमूल्य वरदान


कारवी!! सह्याद्रीत तंगडतोड करणाऱ्यांना हा काही नवखा शब्द नाही. डोंगर उतारांवर वाढणारी ही झुडूप वजा वनस्पती म्हणजे सह्याद्रीला लाभलेले एक अमूल्य वरदानच म्हणायला हवे. सात-आठ वर्षे उंच उंच वाढणारी ही झुडपे अशी काही दाट जाळी निर्माण करतात, की भरउन्हाळ्यातही या जाळीच्या छायेतून फिरताना उन्हाचा दाह जाणवू नये. एवढेच काय तर डोंगर उतारावरून मुरमाड मातीतून तोल सांभाळत उतरताना आधारासाठी मदतीचा हात पुढे करत उभी असतात ती हीच कारवीची झाडे. कारवीची मुळे जमिनीत अशी काही जाळी गुंफतात, की वाऱ्या-पावसामुळे होणारी जमिनीची धूप आटोक्‍यात येते. जमिनीत खोल शिरणारी कारवीची मुळे पाण्याचा जमिनीतील पाझर वाढवून भूजल स्थर वाढवण्यास हातभार लावतात. याच कारवीच्या दाट जाळीच्या आश्रयाला वाढतात अनेक ऑर्किड (ground orchids) आणि लिली (lilies) ज्याचे गुरांपासून संरक्षण करते ही करावी. कारवीची पाने जनावरांच्या चाऱ्यास उपयोगी पडतात. तर अनेक कीटकांना खाद्य, निवारा आणि संरक्षण मिळते ते याच कारवीच्या झुडपांवर. या कारवीचे अनोखे वैशिष्ट्य म्हणजे तिचे (mass flowering) एकत्रित बहर, सृष्टीचा एक अलौकिक रंग सोहळा.
ही झाडे सलग सात वर्षे वाढतात आणि आठव्या वर्षी सर्व झाडे एकाच वेळी फुलतात. जांभळ्या रंगाची टपोरी फुले लेऊन जेव्हा ही झाडे संपूर्ण बहरतात तेव्हा डोंगर उतारांना त्या रंगाच्या छटा प्राप्त होतात. या फुलांमधे भरपूर पराग आणि मकर मिळत असल्यामुळे मधमाश्‍या या बहराच्या वेळी कारवीच्या जाळीवरच डेरा देऊन बसतात. भंडारदरा भागात आदिवासी लोक हा कारवीचा मध गोळा करतात. अधिक दाट आणि गडद रंगाच्या या मधाची बाजारात चढ्या भावाने विक्री होते. कारवीच्या आश्रयाला वाढणारे अनेक कीटक जंगलातील इतर वृक्षांच्या (pollination) परागीभवना/ परागीकरणामध्ये महत्त्वाची भूमिका निभावत असल्यामुळे कारवी जंगल संवर्धनास अप्रत्यक्षरीत्या का होईना; पण मोलाचा हातभार लावते. बहर ओसरला, की कारवीची बोंडे सुकू लागतात. या बोंडांवर तरळणारा चिकट तरल द्रव चाखायला गुरांना आवडते. बोंडामधील बिया पक्व झाल्या, की जीवन चक्रातील महत्त्वाची म्हणजेच प्रजननची आपली जबाबदारी पूर्ण केलेली ही झाडे आठ वर्षांची तपश्‍चर्या पूर्ण करून कृतज्ञतेने आपला जीवनकाळ संपवतात. जून महिन्यात पहिल्या पावसाच्या सरीच्या माऱ्याने ही बोंडे तड तड आवाज करत फुटतात आणि त्या झटक्‍याने आतील बिया दूरवर भिरकावल्या जातात. कारवीच्या (mass flowering) एकत्रित बहरचा मुख्य हेतू बिया खाणाऱ्या कीटकांपासून बियांचे संरक्षण. (mass flowering) एकत्रित बहरामध्ये इतक्‍या बिया विखुरल्या जातात, की भलेही काही बिया कीटकांच्या भक्ष्यस्थानी पडल्या, तरी नव्या फुटीसाठी मुबलक बिया शिल्लक राहतात. हाच फंडा नैसर्गिक आपत्ती जसे दुष्काळ, वणवा यामुळे होणाऱ्या नुकासानालाही लागू पडतो. कारवीच्या उंचच उंच सरळसोट वाढणाऱ्या काड्यांचा वापर कुडाचे घर बांधण्यासाठी करतात. एवढेच काय तर कारवीच्या मुळांवर काही परजीवी वनस्पतीदेखील वाढतात. अशा या बहुपयोगी कारवीचा दर आठ वर्षांनी सह्याद्रीत फुलणारा असा हा आगळावेगळा पुष्पोत्सव मन भरून पाहण्याची माझी अनेक वर्षांपासूनची तीव्र इच्छा या वर्षी पूर्ण झाली.
फोटो सौजन्य .प्रवीण इदे

No comments:

Post a Comment